औंध कास भटकंती (भाग -२)


सोमवारी सकाळी उठून रूमबाहेर पाहिलं तर थेट समोर खोल दरी.आणि खालचं सातारा शहर सुर्योदयाबरोबर जागं होत होतं.
.
निवांत मधला छानसा नाश्ता आटोपून आम्ही कासला जायला सज्ज झालो.हॉटेलवाल्यांनी आवर्जून कुमुदिनी तलाव बघाच असं सुचवलं होतं.तो म्हणे फुलांनी भरून गेलाय.त्यामुळे अगदी उत्सूक होऊन कॅमेरे परजून निघालो.अगदी अर्ध्या तासाच्या आतच पठारापाशी पोचलो.तिथे आमच्याकडून कॅमेरा, पार्किंग आणि कर मिळून १३० रु घेतले.राजमार्गावरून सरळ जा,गाडी जाते असे हॉटेलमधून कळले होते.तिथे गेल्यावर मात्र तिथल्या रखवालदाराने फक्त पवनचक्कीवाल्यांच्याच गाड्या जातात आणि दूरवर दिसणार्‍या पवनचक्कीजवळच कुमुदिनी तलाव आहे अशी गूड न्यूज दिली!एक मात्र बरं होतं.फारसं कोणीही आलेलं नव्हतं आणि हवेत गारवा होता.मग निघालो ११ नंबरची बस पकडून रमतगमत! सुरुवातीला ते अंतर बघून चालण्याची धडकी भरली तरी लवकरच त्याचे अनेक फायदे आजूबाजूला दिसायला लागले.झाडांवर चिवचिवणारे अनोखे पक्षी,अगदी जवळून उडणारी सुंदर फुलपाख्रं बघत बघत अंतर आपोआप विसरायलं झालं.एका झुडपापाशी दोन काळी मोठी पतंग फुलपाखरं इतका दंगा करत होती की बस! त्यांना कॅमेरात पकडायचा एकही प्रयत्न त्यांनी यशस्वी होऊ दिला नाही!तेवढ्यात बाजूच्या जाळीवर बाहेर आलेल्या फुलांवर हे महाशय अक्षरशः तहानलेले असल्यासारखे तुटून पडले!
.
बाजूबाजूने छोटी पिवळी फुलं आम्हालाही बघा ना म्हणत असल्यासारखी जाळीतून बाहेर डोकावत होती!
.
जाळीमागे गुलाबी फुलांचे गालिचे सर्वदूर पसरले होते.पण ते येताना पहायचे ठरवून आम्ही चाली चाली करत निघालो.आमच्या मागून काही गाड्यांना मात्र प्रवेश मिळाला होता.बहुधा दक्षिणा देऊन.पण आम्हाला दिसणार्‍या मनोहारी दृश्याने चालण्याचे काहीच न वाटता ,हे लोक मधली मजा मुकणार असं वाटायला लागलं एव्हाना.तेवढ्यात समोरून परतणार्‍या काही लोकांनी आता जवळच आला तलाव ,अगदी बघण्यासरखा आहे सांगून आमचा हुरूप वाढवला!
लवकरच लां... ब वाटणारी पवनचक्की जवळ आल्यासारखी वाटायला लागली.आजूबाजूच्या कभिन्न कातळाच्या बाजूला ओलाव्याने उगवलेली फुलं परत दिसू लागली आणि समोर ते तळं आलं.कुमुदिनीच्या फुलांनी पूर्ण भरलेलं.हिरव्या गोल पानांच्यामध्ये छोटुसं पांढरं पण देखणं फूल.दुपारनंतर ही फुलं मिटून जातात.पाण्याच्या आत पण अनेक पाणवनस्पती फुलल्या आहेत.दूरवर फुलांनी भरलेलं ते तळं पाहून चाल अगदी सार्थक झाली.
.
.
.
.
.
आमच्या सुदैवाने तिथे एक जाणकार छायचित्रकार जोडपं आम्हाला भेटलं.ते मॅक्रो फोटोग्राफी करायला आले होते.त्यांना नक्की कोणती फुलं कुठे आहेत हे सांगणारा फॉरेस्ट गार्ड भेटला होता.त्या काकांना आम्हीही देतो तुम्हाला पैसे पण सर्व दुर्मिळ फुलं मात्र दाखवा असं पटवलं.आणि तळं सोडून काय बघायचं इथे वाटणार्‍या आम्हाला त्या गार्डनी अक्षरशः पाच पावलात दगडांमध्ये दडलेली सुंदर फुलं दाखवायला सुरुवात केली.
तळ्यासमोरच्या दगडाच्या कडेलाच कासचे प्रसिद्ध फूल कंदील पुष्प उगवले होते.आदल्या दिवशी बरीच होती म्हणे.पण रविवारच्या धुडगुसात कोणीतरी तोडली :(त्यामुळे हा वेल या गार्ड लोकांनी दुसर्‍या झुडपात ताणून लपवला होता.
.
.
(कंदील पुष्प)
.
.
(रानहळद)
.
.
(जरतारी. या फुलांचा स्पर्श जरीच्या साडीसारखा म्हणून जरतारी!)
.
.
(मंजिर्‍या,मंजुळा)
.
.
.
(ही निळी कारवी.दर सात वर्षांनी फुलते.)
.
एव्हाना ऊन चढायला लागलं होतं आणि गाड्या आणि माणसांची वर्दळ वाढायला लागली आणि गार्डच्या म्हणण्याचा प्रत्यय आलाच.एक बाई त्या फुलांना तोडून गुच्छ बनवायला लागल्या.गार्ड ओरडला तसं मायंदाळ हैत ना,का वरडतो करून त्याच्यावरच डाफरल्या.तर एक कुटुंबच पुढे मूळासकट गुलाबी फुलांचं झाड जीव खाऊन ओढत होतं.मी आणि मैत्रीण नका तोडू ही फूलं ,हेच बघायला येतो ना आपण म्हणून सांगायला गेलो तर ते बागेत झाड लावणार आहेत या फुलाचं असं कळलं. त्यांना हे गवतफूल आहे,असे उपटून दुसरीकडे लागणार नाही वगैरे सांगायचा निष्फळ प्रयत्न करून आम्ही निघालोच तिथून.
इथून पुढे थोडावेळ मात्र अगदी कभिन्न कातळ लागतो.निसर्गाची सगळे किमया या कातळावर साठ्णार्‍या थोड्याशा मातीच्या थरावर होते आणि अशी सुंदर फुलं मग पावसाळ्यात बीज रुजून आलेल्या झाडांना येतात.पुढे मात्र आता गुलाबी पिवळ्या पांढर्‍या फुलांचे गालिचे सुरू झाले.आजूबाजूला फुलच फुलं आणि मध्ये मी एकटी! माझा एक आवडता चित्रकार आहे,देवदत्त पाडेकर. त्याचे असे एक फुलात हरवलेल्या मुलीचे अप्रतिम चित्र आहे.त्या चित्रात गेल्यासारखं वाटायला लागलं एकदम!
इंदिरा संतांची
" रंगरंगुल्या,सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा"
म्हणून एक सुरेख कविता आहे.ती कविताच या पठारावर भरून राहिली आहे!
.
.
.
.
.
.
(या फुलाचे स्थानिक नाव -कावळा!)
एव्हाना ऊन मी म्हणायला लागलेलं.आणि गर्दीही.आता वाट धरली बामणोलीची.हे कोयना जलाशयाची मागची बाजू.कासवरूनच हा रस्ता पुढे पार महाबळेश्वरपर्यंत जातो.अर्ध्या तासात खालचे जलाशयचे सुंदर दृश्य दिसायला सुरुवात झाली.वळणावळणाच्या रस्त्याने खाली येत येत थेट जलाशयासमोरच आलो.
.
,
इथे एक बोट क्लब आहे.बोट घेऊन तीन चार ठिकाणी जाण्याचे पर्याय मिळतात.इथल्या तीन नद्यांचा संगम असणारे जवळचे ठिकाण, तापोळा तलाव,वासोटा किल्ला आणि वाघळीच्या मठाचा असे.त्यातला मठ आणि संगमाची सफर असा दीड तासाचा कार्यक्रम आम्ही घेतला.पाणी अगदी स्वच्छ नीळे नीळे आहे.थोड्याच वेळात कोयना,सोळशी,कांडती नद्यांचा संगम लागला.तीन नद्या तीन दिशांनी येऊन भेट घेत होत्या.नद्यांचा अनाहिता कट्टा इथे होतो तर!
.
आता समोरचे मंदिर दृष्टिपथात येऊ लागले.एका बेटासारख्या जागी स्वामी नारायणबाबा म्हणून दत्त भक्तानी हा मठ बांधलाय.इथे एक दत्ताचे ,गणपतीचे देऊळ आहे.गणपतीच्या देवळाखाली एक कृत्रिम गुहा करून त्यात शंकराचे देवालय उभारले आहे.अगदी शांत सुंदर जागा.गावाचे नाव मात्र शेंबडी वाघळी! 
.
.
परतताना इथून जाऊच नये असे वाटायला लागलेले असतानाच बोटवाल्याने हाक मारली.येताना बोटीत सर्वच शांत बसलेले.बामणोलीला परतून छानपैकी पिठलं भाकरीचं जेवण जेवलो.
आणि मग ते सुंदर दृष्य ,ती शांतता,निवांतपणाची पोतडी काखोटीला मारली आणि परतीच्या प्रवासाला निघालो..
.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)